पर्यटन छायाचित्रणः आठवणींची साठवण
ठे विले अनंते तैसेचि राहावे, या संतांच्या शिकवणीचा मराठी माणसांवर भलताच परिणाम झाला असावा. निकड असल्याशिवाय मराठी माणूस शक्यतो प्रवास टाळत असे. किमान विसाव्या शतकात तरी हीच स्थिती होती. त्याला कारणंही बरीच होती म्हणा. पैसा हे महत्त्वाचं कारण. मराठी माणूस फारसा कधी धंद्यात दिसत नव्हता. साहजिकच नोकरी करण्याशिवाय त्याला गत्यंतरच नव्हतं. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तर एसएससी झाल्यानंतर सरकारी नोकरीत स्वतःला चिटकवून घेतलं, की लग्नाच्या बाजारात तो मिरवायला मोकळा असायचा. पर्यटनाबद्दलची नाराजी ही आर्थिक कारणांमुळंही होती. फुकटचा दवडायला लोकांकडे पैसाच नसायचा. तसा पगारही तुटपुंजाच असे. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मात्र परिस्थितीनं अचानकच वळण घेतलं. पगार वाढले, पैसा हातात खुळखुळायला लागला आणि मग सुरू झालं भटकणं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यापासून हिमालयातल्या बर्फाळ वाटा तुडवण्यात त्याला मजा वाटू लागली आणि सुरू झाली पर्यटनाची पहाट. पर्यटनाला जाताना प्रत्येकाकडे कॅमेरा असेलच असं नाही. बाजारात हळूहळू चांगले कॅमेरे येऊ लागले होते. कॅनन, निकॉन, ऑलिंपस, फुजीफिल्म, सोनी यांसारख्या कंपन