अशाच एका 'रम्य' सकाळी...
र म्यतेबाबत प्रत्येकाचं मत निराळं असू शकतं. पावसाळी वातावरणातली सकाळ ही रम्य कशी असू शकेल, असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. पडू देत बापड्यांना. एखादी गोष्ट आपल्याला कशी वाटते, हे महत्त्वाचं. इतरांना काय वाटतं याचा आपण फारसा विचार करू नये. हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. तर सांगायचा मुद्दा असा, की सर्द पावसाळ्यातली ती एक रम्य सकाळ होती. खरं तर पहाटेच उठून आम्ही मार्गाला लागलो होतो. मार्ग होता सातारा रस्त्यावरूनच. आमचं गंतव्य स्थान आणि आम्ही यांच्यामध्ये खेड शिवापूर ओघानंच येतं. या गावातील गणेश प्रसाद हॉटेलातली झणझणीत मिसळीचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढं जाणं शक्यच नसतं. ...तर आम्ही मिसळीवर यथेच्छ ताव मारून भोरच्या दिशेनं गाडी हाकली. वरंध घाटातून निसर्गशोभा पाहात आणि शक्य तिथं थांबून छायाचित्रं काढण्याचा आमचा कार्यक्रम अखंडितपणे चालू असतो. परिणामी तीन तासांच्या प्रवासासाठी आम्हाला किमान पाच तास तरी मोजावे लागतातच. पण आज निसर्गाचंच काहीतरी बिनसलं होतं. भोर मागं टाकेपर्यंत पावसाची अखंड झोड चालू होती. मित्राच्याच मारूती नामक कंपनीनं तयार केलेल्या जिप्सी जातीचं वाहन आम्ही घेतलं होतं. पावसाळ